

वर्धा : वर्ध्यातील मांडवा ते वर्धा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. उमरी (मेघे) ते मांडवादरम्यान तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या रस्त्याची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी आंदोलन ठिय्या केले. आंदोलनाच्या माध्यमातून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले.
वर्धा ते मांडवा मार्गाने अनेक गावांतील नागरिक, प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी आवागमन करतात. मागील दोन ते तीन वर्षांपासून उमरी (मेघे) ते मांडवा या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेने त्रस्त नागरिकांनी आंदोलन केले. मांडवा, बेलगाव, झाडगाव, दिग्रस, उमरी आणि परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत दिग्रस शिवारात ठिय्या आंदोलन केले. लवकरच रस्ता दुरूस्तीला सुरूवात करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.