

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी २९ मे रोजी ही घटना घडली. मृतांमध्ये अतुल किनकर (वय ४०), त्यांची मुलगी रिद्धिमा अतुल किनकर (वय १५), मुलीची मैत्रीण गुंजन मेश्राम (वय १५) सर्व रा. शेडगाव यांचा समावेश आहे.
अधिक मासानिमित्त आंघोळीसाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. नदीत स्नान करत असताना अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. ही माहिती गावात कळताच गावकर्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शोध मोहीम राबवण्यात आली.
काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी आकाश अवथरे, तसीलदार कपिल हाटकर, उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायर, पोलिस निरीक्षक अनिल ठाकूर, समुद्रपूरचे ठाणेदार रवींद्र रेवतकर, गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी भेट दिली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.