

वर्धा ः जागेच्या जुन्या वादातून केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी मुलगा, वडिलाचा मृत्यू झाला. नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने चाकू हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली. ही घटना महिलाश्रम परिसरात ४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत प्रभाकर भलमे (वय ५५) आणि मुलगा रितेश भलमे (वय २५) रा. बरबडी यांचा मृत्यू झाला. बरबडी येथील प्रभाकर भलमे मित्राच्या मुलाच्या लग्न सोहळ्याकरिता गेले होते. मित्राच्या मुलाचा लग्नसोहळा आटोपून ट्रॅव्हल्सने परत आले. लग्न सोहळा आटोपून परतल्यानंतर प्रभाकर भलमे, मुलगा रितेश भलमे हे महिलाश्रम परिसरात असताना नातलग असलेला अल्पवयीन मुलगा तेथे आला आणि त्याने रितेश तसेच प्रभाकर भलमे यांच्यावर चाकूने वार केले.
त्यात रितेश भलमे, प्रभाकर भलमे हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. चाकू हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने शोध घेत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.