

वर्धा : समृद्धी महामार्गावर शनिवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास भरधाव कार आणि ट्रक यांच्यात अपघात घडला. विरूळ शिवारात कारने ट्रकला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच. ४९ बी. आर. ७०४७ क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. या कारने दानिश खान तसेच अविस खान, परवेज खान, अफजल हुसेन, सिराज शेख, मोहम्मद नावेद असे नागपूरकडे जात होते.
दरम्यान विरूळ शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. यात धडकेनंतर ट्रक चालकाचाही वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावर उलटला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. अपघातात दानिश खान तसेच अविस खान, परवेज खान, अफजल हुसेन, सिराज शेख हे जखमी झाल्याचे समजते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुलगाव पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिस मदत केंद्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.