वर्धा : इठलापूरमध्ये प्रेम संबंधातून तरुण, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; विहिरीत आढळले मृतदेह

वर्धा : इठलापूरमध्ये प्रेम संबंधातून तरुण, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; विहिरीत आढळले मृतदेह
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : आर्वी तालुक्यातील इठलापुर शिवारात विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह आढळला. प्रेम संबंधातून त्यांनी जीवन संपवल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि. ११ मार्च) दुपारी ही घटना उघडकीस आली.
उमेश मोरेश्वर राउत (२७ वर्ष), वैष्णवी (२१ वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही बाभुळगाव येथील रहिवाशी. उमेश हा येथील प्लायऊड फॅक्टरीमध्ये काम करीत होता. वैष्णवी सोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आई वडीलाच्या संमतीने लग्न करण्याचं ठरवलं. उमेशने याची माहिती घरच्यांना दिली आणि लग्नाकरीता परवानगी मागीतली. मात्र आईने त्याला नकार दिला. वारंवार प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. उमेश राउत हा शनिवारी (दि. ९) पाच नंतर घरी आला नाही. पत्ता न लागल्याने त्याच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यानंतर इठलापूर पुनर्वसन लगतच्या शेतातील विहीरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती रणजीत घोडमारे यांनी भ्रमणध्वनीवरुन पोलिसांना दिली. पोलीस जमादार पालसाहेब जाधव व पोलीस शिपाई किशोर साठवणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उमेशचा मृतदेह पाण्यावर तंरगत असताना आढळून आला. विहीरीत गळ टाकुन शोध घेतला असता वैष्णवी हिचा सुध्दा मृतदेह आढळून आला. दोघांचेही मृतदेह विहिरीच्याबाहेर काढण्यात आला. त्यांनतर दोन्ही मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी नोंद घेतली. लग्नास विरोध दर्शवल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news