वर्धा, पुढारी वृत्तसेवा : समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथे कपाशी बियाण्याचे अनधिकृत असलेले 79 हजार 488 रुपये किमतीचे 92 पॅकेटस जप्त करण्यात आले. ही कारवाई कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथे कैलास नवघरे यांच्याकडे छापा टाकून अनधिकृत बियाण्याबाबत तपासणी करण्यात आली. त्यावेळी कंपनीचा उल्लेख नसलेला 450 ग्रॅम वजनाची तब्बल 92 पाकिटे आढळून आली. संशयास्पदरित्या आढळून आलेल्या अनधिकृत कापूस बियाणे 92 पॅकेट्स वजन 41.40 किलोग्राम असून त्याचे मूल्य रुपये 79 हजार 488 रुपये आहे. सदर पाकीटे पंचासमक्ष जमा करून आरोपीसह गिरड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहेत.
ही कारवाई नागपूरचे विभागीय कृषी सह संचालक शंकर तोटावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी संदीप ढोणे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रमोद पेटकर, तालुका कृषी अधिकारी रामू धनविजय, कृषी पर्यवेक्षक अनिल खरसे, प्रफुल हेडाऊ, सचिन ठाकरे, विकास ढाकरे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे यांनी केली.
हेही वाचा :