

वर्धा : थकीत वीजबिलांचा भरणा न करणार्या नागपूर परिमंडळातील वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यात तब्बल एक हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
नागपूर परिमंडळात म्हणजे नागपूरसह वर्धा जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे १८ लाख ८५ हजारावर वीज ग्राहक आहेत. त्यापैकी वीज बिल थकविणार्या ग्राहकांना महावितरणाच्या थकबाकीदारांना बिल भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच, थकबाकी भरण्याची मुदत संपल्यानंतर मोबाइलवरून वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस देण्यात येत आहे. त्यानंतरही बिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
नागपूर परिमंडळात १ ते २४ मार्च या काळात तब्बल ७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठीपोटी खंडित करण्यात आला आहे. यात नागपूर शहर मंडळातील ४ हजार ९६९, नागपूर ग्रामीण मंडळातील १ हजार ५६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात १ हजार ३१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या या ग्राहकांपैकी वर्धा मंडळातील ५५८ ग्राहकांनी थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करीत आपला वीजपूरवठा पुर्ववत करुन घेतला. थकबाकीदारांविरोधात ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक, लेखा व मानव संसाधन विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची विविध पथके स्थापन केली आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणकडे थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत जोडला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यावर थकबाकी न भरता परस्पर वीजपुरवठा जोडणार्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वीजबिलांचा तातडीने भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सुटीच्या दिवशी देखील महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. वीजबिलाचा‘ऑनलाइन’ भरणा केल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीज बिलामध्ये पाव टक्के सुट दिली जाते, याचसोबत क्रेडीट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायाद्वारे वीज बिलाचा ऑनलाईन भरणा निशुल्क आहे. सबब, ग्राहकांनी त्यांच्या विज बिलाचा वेळीच भरणा करुन वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.