वर्धा : घरातील लहान मुल हरवले की कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा विरहाच्या वेदना सोसणार्या कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाने राबविलेली 'ऑपरेशन मुस्कान-१४' ही मोहीम यशस्वी ठरली आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत मागील महिनाभरात पोलिसांनी शोध घेत १० बालकांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे. तसेच अन्य १० बालकांचेही सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी ४ उपविभागांतर्गत ४ विशेष पथके व अनैतिक मानवी वाहतूक शाखा यांचे एक पथक असे पाच पथके तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये ४ अधिकारी आणि ३८ पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले. पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
मोहिमेदरम्यान, ज्या बालकांच्या बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये होती, अशा १० बालकांचा शोध लावण्यात आला. त्यात २ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १० बालकांना जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकार्यांशी समन्वय साधून त्यांच्या पालकांचा शोध घेऊन सदर बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. समाजात उघड्यावर भिक मागणार्या बालकांकडेही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.
मोहिमेदरम्यान भिक मागताना आढळलेली ६ मुले व ४ मुली असे दहा बालकांना रेस्क्यू करण्यात आले. बालमजुरी आणि मानवी तस्करी रोखण्यासाठीही जिल्हयात विविध ठिकाणी छापे टाकून कडक नजर ठेवण्यात आली होती. या मोहिमेच्या यशात जिल्हा चाईल्ड लाईन (१०९८), जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.