

वर्धा : सौरऊर्जेचे महत्त्व जाणून घेत वर्धा जिल्ह्या अंतर्गत आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) गावात १३२ घरगुती ग्राहक, ग्रामपंचायतीकडून छतावर सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम होण्याचा मान या गावाने मिळविला आहे. ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय आणित जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया करुन दाखविली आहे.
सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार्या या गावात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही किमया साध्य करणार्या या गावाने संपुर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान २ गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमेंअर्गत वर्धा जिल्ह्यातील चिचघाट-राठीच्या पाठोपाठ या नेरी (पुनर्वसन) गावातील सर्व १३२ घरगुती ग्राहक आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या गावाची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे १५० किलोवॅट झाली आहे.
वर्धा शहरापासून ५०किमी तर आर्वीपासून अवघ्या २ किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या आर्वी उपविभागाअंतर्गत असलेल्या नेरी (पुनर्वसन) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने या गावात जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणाच्या मानस करिता महावितरणच्या अवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर’ मोफ़त वीज योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव तयार करून वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. सौरऊर्जेचे महत्व जाणून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील त्यास प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास मंजुरी दिली. महावितरण, गावकरी, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नेरी (पुनर्वसन) हे गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फ़डणवीस, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक अरविंद भादीकर, संचालक प्रसाद रेशमे यांच्या निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता प्रदिप घोरूडे यांच्या विशेष पुढाकाराने आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड, उपकार्यकारी अभियंता अमित गायकी, सहायक अभियंता रुपेश सोनटक्के, प्रधान तंत्रज्ञ रामटेके व बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ पवन मुंजेवार यांच्या अविरत प्रयासाने नेरी (पुनर्वसन) या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे.