गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : व्याघ्र दर्शनासाठी सुपरिचित असलेल्या जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय राज्याच्या वनविभागाने घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून २० मे रोजी नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये दोन वाघिणी सोडण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष प्रचंड वाढला आहे. संघर्षात शेकडो प्राणी त्याच्या जिवास मुकली आहेत. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वाघांच्या संवर्धन स्थानांतरणाला हिरवा कंदील मिळाला. त्यासाठी जागांची शोधमोहीम राबविण्यात आली. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या समांतर नाही. त्यामुळे येथे वाघिणी सोडून ही संख्या समांतर करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब व त्यांची चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. या वाघिणींना काही दिवस खुल्या पिंजऱ्यात ठेवून मग रेडिओ कॉलर लावून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी २० मे रोजी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतीत व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात दोन वाघिणी सोडण्यात येणार आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-४ वाघीण अलीकडेच तिच्या चार शावकांसह फिरताना दिसली. तिचे वास्तव सध्या साततोंडी पहाडी परिसरात आहे. आता अभयारण्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार असल्याने हे चांगले लक्षण असल्याचे समजते. वाघाच्या पिल्लांचे वय चार ते पाच महिन्यांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवालानुसार, व्याघ्र प्रकल्पात सध्या १२ ते १७ वाघ आहेत. वनविभागाने ब्रम्हपुरी रेंजमधून आणखी दोन वाघिणी आणल्या जाणार आहेत. यासंदर्भात मानद वन्यजीव वॉर्डन सावन बाहेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, टी- ४ वाघिणीसह चार शावक दिसल्याने व्यवस्थापनाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. अधिकाऱ्यांना शावकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी लागेल आणि अभयारण्यात सोडल्या जाणाऱ्या दोन नवीन वाघिणींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवावे लागेल.
हेही वाचा :