नागपूर; पुढारी वृत्तसेवा : औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या आज दुर्मिळ होत आहेत. गुळवेल, मटारु, काटेमोड, आघाडा, केना, अंबाडी आदी ग्रामीण भागात उगवणाऱ्या याच दुर्मिळ रानभाज्या शहरी नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्यवर्धक या रानभाज्यांना महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषी विभाग, 'आत्मा' तसेच 'उमेद' यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटक म्हणून श्रीमती बिदरी बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सैाम्या शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, उमेदच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर आदी यावेळी उपस्थित होते.
या रानभाजी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बचत गट तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले असून या स्टॉलवर रानभाज्यामध्ये गुळवेल, मटारू, भुई आवळा, राई भाजी, कपाळ-फोळी, रताळे, काटेमोड, आघाडा, केना, तरोडा, अंबाडी, दिंडी या भाज्यांचा समावेश असून या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस् अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यात मदत करण्यात. तसेच मधुमेह, त्वचेची समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. राई ही भाजी कफ-पित्तदोष रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासाठी उपयुक्त आहे.
नागपूर जिल्ह्यात उपलबध असलेल्या विविध रानभाज्या संदर्भातील माहिती तसेच त्याची उपयुक्तता आदी माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या हस्ते झाले.
जनजागृती महिला बचत गट डवलामेटी, प्रगतिशील महिला समूह नेरी- तालुका कामठी, भारत माता महिला बचत गट ठाणा-तालुका उमरेड, कृषी क्रांती महिला बचत गट मंगरूळ -तालुका नागपूर, प्रगतिशील महिला जैविक उत्पादक गट रानमांगली -तालुका भिवापूर या बचत गटांना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित रानभाज्या महोत्सव उद्या शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.