चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमध्ये झालेल्या वाघांच्या झुंजीत एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. आज त्या वाघाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. अवघ्या दोन महिण्यात सहा वाघांचा मृत्यू झाल्याने ताडोबा व्यवस्थापन चिंताग्रस्त झाले आहे. वनाधिकाऱ्यांनी ह्या वाघाचा मृत्यू झुंजीत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. दिवसागणिक ताडोबा व त्याबाहेर वाघांच्या झुंजीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ह्या झुंजी कशा? रोखव्यात असा प्रश्न ताडोबाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काल रविवारला सायंकाळच्या सुमारास पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळून आलावनविभागाचे पथक गस्त करीत असताना ताडोबा बफर क्षेत्रातील चक निंबाळा गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हा वाघ आधीपासून जखमी असावा, असाही अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून दोन वाघांमध्ये अधिवास क्षेत्रावरून झालेल्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. सदर घटनेची माहिती ताडोबाच्या अधिकाऱ्यांना होताच ते घटनास्थळी पोहचले. वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह चंद्रपूर येथील उपचार केंद्रात (टीटीसी) आणण्यात आला. आज सोमवारी सकाळी टीटीसी केंद्रामध्ये त्या वाघाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.
मागील दोन महिण्यात चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांचा मृत्यू झाला आहे. 3 जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तालुक्यात एका शेतातील विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. 4 जानेवारीला सावली रेंजमधून सुटका करण्यात आलेल्या वाघिणीचा 14 जानेवारीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर शेतात विजेचा धक्का लागून वाघिणीचा मृत्यू झाला होता. 14 जानेवारीच्या रात्री भद्रावती क्षेत्रांतर्गत माजरी येथे, तर 5 फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा क्षेत्रामधील घोसरी बीट अंतर्गत शेतात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. यानंतर पूर्ण वाढ झालेल्या एका वाघाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. 12 फेब्रुवारी रोजी वरोरा क्षेत्राच्या सीमेवरील पोथरा नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला होता. दोन महिन्यांच्या कालावधीत 6 वाघांचा मृत्यू झाल्याने ताडोबा व ताडोबा बाहेरीत वन विभागाचे अधिकारी चिंताग्रसत झाले आहे. ताडोबात व त्याबाहेरील क्षेत्रामध्ये वाघ यांच्या झुंजीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अधिवास क्षेत्रातच ह्या घटना घडत असल्याने भविष्यात ह्या घटना कशाप्रकारे रोखल्या जातील, असाही प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.