नागपूर : विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील ३८ लाखांवरील कामगारांची नोंदणी करून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यावर भर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार (दि.21) बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. फडणवीस यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. गोपालनगर परिसरातील नवनिर्माण गृह संकुलाच्या मैदानावर आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, माजी महापौर संदीप जोशी, नगर सेविका सोनाली कडू आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे. या कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे.बेघर कामगारांना ‘अटल आवास योजना’ आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून ४ लाखांची आर्थिक मदत देऊन हक्काची घरे देण्यात आली. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यात येत आहे.बांधकाम कामगारांना आज सुरक्षाकवच कार्ड देण्यात आले असून याद्वारे कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य,शिक्षण,घरकुल आदी १२ सेवा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.