

Maharashtra Drug Issue
नागपूर : महाराष्ट्र ड्रगमुक्त करण्याची गरज आहे, नाहीतर तरुणाई उध्वस्त होईल महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. अंमली पदार्थ तस्करीत मदत करणाऱ्या १७ पोलिसांना बडतर्फ करावे लागणे, हे राज्याच्या गृहविभागाचे मोठे अपयश आहे. जेव्हा खाकी वर्दीच तस्करांना साथ देते, तेव्हा नेस्को सेंटरसारखी प्रकरणे गल्लोगल्ली घडणारच.
केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, या 'ड्रग माफिया'च्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तींना कधी शोधणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. १० वर्षांपूर्वी जे प्रमाण पंजाबमध्ये होते, आता तशीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसतेय. अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे.
केवळ मुंबई-पुणेच नाही, तर आता नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील ग्रामीण भागातही अंमली पदार्थांच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. 'नेस्को सेंटर'मधील ताज्या प्रकरणामुळे राज्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात कशी अडकतेय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.सन २०२४ मध्ये ४,२४९ कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
तर २०२५ पासून आतापर्यंत १५,९३३ आरोपींना अटक झाली आहे. २०२६ मध्ये केवळ काही महिन्यांतच १,४३८ गुन्हे नोंदवले गेले असून १,६३७ आरोपींना अटक करण्यात आली आणि ९४० कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अजून वर्षाचे अर्धेही पूर्ण झालेले नाही, तरी ही आकडेवारी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दाखवते.