

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा, अपमान करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या बागेश्वरधाम भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे; अशी मागणी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही इमादशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल, बाहेरप्रदेशातून आलेले इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा जाज्वल्य इतिहास असताना धीरेंद्र शास्त्रीने सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला.
सर्वात संतापजनक म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री गडकरी, संघाचे सरसंघचालक मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र शास्त्रीला का अडवले नाही? स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचवणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल..आहे का हिंमत? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
अंनिसच्या आव्हानाकडे दुर्लक्ष की उत्तर देणार ?
विशेष म्हणजे नागपुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा श्याम मानव यांनी बागेश्वरधाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आपल्या अटीनुसार दिव्यशक्ती सिद्ध करा, 80 लाख जिंका, अन्यथा 8 लाख अनामत रक्कम जप्त होईल असे आवाहन दिले. शुक्रवारी भारत दुर्गा मंदिर भूमिपूजन सोहळ्यात, धर्मसभेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी याकडे दुर्लक्ष केले. चार मुले जन्माला घाला, एक राष्ट्रसेवेसाठी संघाला द्या असे विधान केले. आजपासून त्यांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने आता या उलटसुलट वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते विरोधकांना काय उत्तर देतात की, मौन पाळून चर्चेत राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.