

नागपूर : विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, कुपोषण हे प्रश्न सुटू शकत नाहीत व विदर्भाचा माणूस स्पर्धेत उभा होऊच शकत नाही असे परखड मत भाजपनेते माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त करीत एकप्रकारे भाजपला स्मरण करून दिले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते. विदर्भाचे वास्तववादी चित्र या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेकांनी मांडले.
हुतात्मा भगतसिंह, राजगुरू, सुखदेव व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली वाहून पहिल्या सत्राची सुरुवात झाली. विदर्भातील सर्व समस्यांचे मूळ सरकारचे सर्व आर्थिक स्रोत आटल्यामुळे व कर्जबाजारीपणामुळे दिवाळखोरीच्या वाटचालीकडे असल्यामुळे विदर्भाचा सिंचनाचा व इतर क्षेत्रातील ७५ हजार कोटींचा अनुशेष कदापिही भरून निघू शकत नाही. त्यामुळे १३१ धरणे पूर्ण होऊन १४ लाख हेक्टरचे सिंचन होऊ शकत नाही. परिणामी, शेतकरी आत्म्हत्यांचे सत्र थांबू शकत नाही. विदर्भातील माणसाला माणूस म्हणून जगण्याकरिता त्याचा धंदा, उद्योग, व्यापार फायद्याचा होऊच शकत नाही. त्यामुळे विदर्भातील माणसाची क्रयशक्ती वाढू शकत नाही व त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू शकत नाहीत. म्हणून सर्व संघटनांनी एकमेकांच्या आंदोलनाला सहकार्य करून व संघटितपणे लढून भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवावी यावर सेवानिवृत न्यायमूर्ती (सर्वोच्च न्यायलय) विकास सिरपूरकर यांनी उद्घाटनीय भाषणात भर दिला.
व्यासपीठावर माजी आमदार वामनराव चटप,शेतकरी नेते,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, रंजनाताई मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरूण केदार, मुकेश मासुरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, धनंजय धार्मिक, विष्णूपंत आष्टीकर,ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तूनवार, सुनील चोखारे, शैलजताई देशपांडे, अयुब शेख, नरेश निमजे, प्रशांत नखाते, कृष्णराव भोंगाडे, राजेन्द्रसिंह ठाकूर, सुरेश वानखेडे, सुरेश जोगळे, ओमप्रकाश तापडीया, राजेन्द्र आगरकर, मंजुषा तिरपुडे, गुलाबराव धांडे व तेजराव मुंडे यांनी या अधिवेशनात विचार व्यक्त केले.