

Savji Food Controversy Nagpur
नागपूर : सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा तीव्र निषेध केला आहे. समितीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंढे यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन विदर्भातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
मासुरकर यांनी म्हटले आहे की, सावजी मटण किंवा सावजी जेवण ही केवळ खाद्यपद्धती नसून नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा, खाद्यसंस्कृतीचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या परंपरेबाबत अवमानकारक किंवा सर्वसाधारण स्वरूपाची विधाने करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, "कोल्हापूरमधील नागरिकही अतितिखट पदार्थ खातात, जे अनेकदा सावजी जेवणापेक्षाही अधिक तिखट मानले जातात. मग त्यांना हार्ट अटॅक का होत नाही? एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अनुभव संपूर्ण खाद्यसंस्कृतीवर लादणे योग्य नाही. एखादा पदार्थ एखाद्याला मानवत नसेल, तर तो त्याचा वैयक्तिक अनुभव असू शकतो; मात्र त्यावरून संपूर्ण विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरत नाही."
सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी कोणत्याही प्रदेशाच्या संस्कृती, परंपरा आणि स्थानिक भावनांचा आदर राखून वक्तव्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मतभेद व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी त्यातून एखाद्या प्रदेशाच्या अस्मितेचा अवमान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी आपले वक्तव्य तातडीने मागे घेऊन विदर्भातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने केली आहे.