

नागपूर : चीन पाठोपाठ भारतात दाखल झालेल्या एचएमपीव्ही व्हायरसचा प्रभाव वाढत असल्याचे दिसत आहे. तीन रुग्ण आढळल्यानंतर कोव्हीड संक्रमणाप्रमाणे गाफील राहता कामा नये, यादृष्टीने राज्य सरकारला योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत आदेश दिले जावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अॅड. श्रीरंग भांडारकर यांच्यामार्फत अर्ज दाखल करण्यात आला आहे.
कोव्हीड संक्रमणकाळात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करवून घेतली होती. अद्याप ती प्रलंबित असून यावेळी अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालयीन मित्र होते. आता भांडारकर यांनीच पुन्हा एकदा या महत्वाच्या बाबतीत लक्ष वेधले आहे. न्यायालयाने राज्याच्या आरोग्य विभागाला एचएमपीव्ही व्हायरसवर लक्ष ठेवण्यासाठी चाचण्या वाढविणे आणि तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावे. टास्क फोर्स गठीत करणे, वैद्यकीय सेवांची तयारी याबाबतीतही त्यांनी सरकारला निर्देश देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे तूर्तास धोका नाही, सतत हात धुणे, शिंकताना, खोकलताना तोंडावर रुमाल ठेवावा पुरेशी खबरदारी घ्यावी. असे आवाहन केंद्र व राज्य सरकार आरोग्य विभागाने केले आहे.