

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर स्वामीत्व मिळावे यासाठी आजपासून स्वामित्व योजना सुरू केली. ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
वनामती येथील सभागृहात आज स्वामीत्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता. हा नारा ख-या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगीकारला आहे. गेल्या दहा वर्षात गावाकडे चला ही भूमिका घेऊन गावांचा विकास होत आहे. समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध लोककल्याणाच्या योजना राबविण्यात येत आहेत.
राज्यातील सुमारे ८.५ कोटी नागरिक वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहेत. या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वयंपूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे बळकटीकरण हे वैयक्तिक लाभार्थी योजनांच्या माध्यमातून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात गतीमान आणि पारदर्शी काम करण्यावर भर आहे. येत्या शंभर दिवसात महसुली खात्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची गरज आहे. या अनुषंगाने सर्व मुद्रांक कार्यालये ही पासपोर्ट कार्यालये करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले. पांदण, शिवपांदण रस्त्यांना आता रस्ते क्रमांक मिळणार आहेत. यातून वेगवेगळ्या योजनेतून या रस्त्यांची कामे करता येणे शक्य होणार असल्यावर भर दिला. सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.