

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ समाजसेविका सुनंदा मोहनी यांचे आज बुधवारी दुपारी साडेतीन वाजता धरमपेठ, येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पुत्र भरत, दोन कन्या अनुराधा, यशोदा, आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांनी नेत्रदान आणि देहदान केले असून त्यांचा पार्थिव देह उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत श्री मोहिनीराज धरमपेठ नागपूर येथे दर्शनासाठी ठेवला जाणार आहे
ऐन तारुण्यात त्यांनी शंकरराव देव ह्यांच्या सोबत भूदान यात्रेत सक्रीय सहभाग घेतला. भाषाविद् दिवाकर मोहनी ह्यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांनी मोहनी परिवाराशी संबंधित मातृ सेवा संघ व अन्य सामाजिक संस्थांच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. माधानच्या कस्तुरबा सर्वोदय मंडळाच्या उपाध्यक्ष व कमलाबाई होस्पेट स्त्री सहाय्यक मंडळाच्या अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी अनेक स्त्रिया व मुलींच्या आयुष्याला आकार दिला.
दिवाकर मोहनी ह्यांच्या नागरी लिपी व प्रमाण लेखनविषयक संशोधनात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. काव्यातील छंद आणि वृत्त हा विषय पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी कस्तुरबांचे चरित्र लिहायला घेतले व ते 'गांधीजींची जीवन संगिनी: कस्तुरबा' शीर्षकाने मनोविकास प्रकाशनाने गांधीजन चरित्र मालेंतर्गत प्रकाशित केले. दिवाकर व सुनंदा मोहनी ह्या दाम्पत्याने मित्र-सखा-मार्गदर्शक बनून असंख्य युवक युवतींचे मेंटरिंग केले.