

नागपूर- विद्यार्थी प्रवेशासाठी महत्वाच्या आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत आता न्यायालय आणि शिक्षण विभागाच्या मुदतवाढीमुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. शिक्षण विभागाने आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने शंकर आत्राम यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा अंतरिम आदेश दिला.
राज्य सरकारने १२ फेब्रुवारी २६ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील एक किलोमीटरची मर्यादा आणि फक्त दहा शाळांची निवड ही अट होती. आता न्यायालयाने याचिकाकर्त्याला त्यांच्या निवास स्थानापासून तीन किलोमीटर परिसरातील शाळेत अर्ज करण्याची मुभा दिली आहे. आरटीई कायद्याच्या तरतुदी तसेच संविधानातील कलम १४, २१ आणि २१-अ यांच्या विरोधात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने त्या अटीवर स्थगिती देण्यात आली होती. बॉक्स...
शिक्षण विभागाकडून 18 मार्चपर्यंत मुदत
दरम्यान, उच्च न्यायालयाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी शिक्षण विभागाने 8 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ राखीव जागांवरील २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेस आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १० मार्च ही शेवटची तारीख होती. आता १८ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. पालकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे. मंगळवारी विहित वेळेपर्यंत जिल्ह्यातील सात हजार ८१ रिक्त जागांसाठी १७ हजार ३१९ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले.