

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प असे विविध प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन सोहळे होत आहेत. पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करणार का,असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की नवी मुंबई विमानतळाचे काम अपूर्ण आहे, डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाण होणार आहेत अशा वेळी अपूर्ण राहिलेल्या कामाचे उद्घाटन हे फक्त श्रेय घेण्यासाठी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी इव्हेंट जोरात सुरू आहे पण ते करताना राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये.
सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना आहे यातून काही आत्महत्या झाल्या. मुळात त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे हे समजून घेतले पाहिजे. ओबीसींना वारंवार कोणी टार्गेट करत असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही अशी भूमिका वडेट्टीवर यांनी स्पष्ट केली.
१० ऑक्टोबर रोजी नागपुरात ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा होणार आहे. हा मोर्चा सकल ओबीसी संघटनांचा आहे या मोर्च्यात जे कोणी सहभागी होतील त्यांचे स्वागतच करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.