

नागपूर : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या १०६ प्रवाशांना दिलासा मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. काठमांडूहून हे सर्व प्रवासी दानापूर (बिहार)च्या दिशेने रवाना झाले असून जनकपूरमार्गे बिहार सीमेवर ते उद्या सकाळी पोहोचण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेतल्यानंतर काठमांडूहून जनकपूरपर्यंत प्रवाशांसाठी नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी स्थानिक पातळीवर चार मिनी बसची व्यवस्था केली. त्यामुळे प्रवाशांचा पुढील प्रवास सुरळीत झाला आहे.
बिहारहून रेल्वेने परतीची व्यवस्था
हे १०६ प्रवासी जनकपूरमार्गे बिहार सीमेवर पोहोचल्यानंतर त्यांना दानापूरपर्यंत नेण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे या प्रवाशांना सुरक्षितपणे नागपूरला परत आणण्यात येणार आहे.
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या नागपूरच्या नागरिकांच्या परतीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवाशांना काठमांडूहून पुढे जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे.