

Dhirendra Shastri effigy burning Nagpur
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर त्यांनी माफी मागितली असली तरी नागपूरमध्ये अजूनही त्यांच्याविरोधात संताप कायम आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडत पुतळा दहन केले.
रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धांमुळे थकले आणि त्यांनी आपले संपूर्ण राज्य समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले. या विधानामुळे शिवप्रेमी आणि विविध संघटनांमध्ये तीव्र संताप उसळला.
वाढत्या वादामुळे, धीरेंद्र शास्त्री यांनी नंतर आपल्या या विधानाबद्दल माफी मागितली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर चव्हाण, सचिव डॉ. मेहुल अडवाणी, नागपूर शहर काँग्रेस समितीच्या ओबीसी सेलचे सरचिटणीस अभिजीत ठाकरे, अतुल नाईक, तसेच मध्य नागपूर युवक काँग्रेसचे आयुष राऊत, अमन लुटे, गोविंदा अजणकर आणि आयुष गायकवाड यांचा समावेश होता.
आंदोलकांनी संपूर्ण परिसर "जय भवानी, जय शिवाजी" च्या घोषणांनी दणाणून सोडला. कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कुणबी समाज आणि इतरही संघटनांचा संताप लक्षात घेता येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.