

नागपूर : नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती घोटाळा प्रकरणात वेतन अधीक्षक निलेश वाघमारे फरार असून, विशेष तपास पथक पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे.
SIT स्थापन झाल्यापासून तत्कालीन शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळ सचिव वैशाली जामदार, चिंतामण वंजारी यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. आता वाघमारेंना अटक झाल्यानंतर या घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे होऊ शकतील, अशी माहिती एसआयटी प्रमुख पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी शनिवारी (दि.२४) दिली.
नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १५वर पोहोचली आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस शिक्षक भरतीचा कारभार सन २०१० पासूनच सुरू होता. तेव्हापासून जवळपास १ हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची बाब सायबर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे.
१ हजार नियुक्त्यांपैकी फक्त ३५० नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित नियुक्त्यांसंदर्भात योग्य प्रक्रिया न पाळताच शालार्थ आयडी देण्यात आल्या. त्यामुळे जवळपास ६५० शिक्षकांच्या नियुक्त्या या बोगस असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व ६५० बोगस नियुक्त्यांबद्दल शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांचे वेतनही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाला मोठे आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक दृष्या या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे, असेही एसआयटीचे प्रमुख राहुल मदने यांनी स्पष्ट केले.