

नागपूर : पावसाळ्याची सुरुवात होताच शहरात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढतात. गेल्या महिनाभरात तब्बल ६२ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती मेडिकल व मेयो शासकीय रुग्णालयातून समोर आली आहे. सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांनी खाली बघून पावले टाकावीत असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
पावसामुळे सापांची बिळे आणि नैसर्गिक अधिवास पाण्याने भरल्यामुळे साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्त्यांकडे वळतात. त्यात अनेकांच्या घराजवळ साचलेले कचऱ्याचे ढीग हेसुद्धा वाढलेल्या सर्पदंशांचे मोठे कारण आहे. त्यात जून ते नोव्हेंबर या कालावधीत सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. 'मागील वर्षी मेडिकलमध्ये तब्बल ४३७ सर्पदंशांचे रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत मेडिकलमध्ये ९९ तर मेयोमध्ये ५३ सर्पदंशांची प्रकरणे नोदविण्यात आली.
गतवर्षी मेडिकलमध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ७२ सर्पदंशाची प्रकरणे समोर आली. विशेष म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात सहा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्पदंशानंतर घरगुती उपायांमध्ये वेळ घालवू नये. तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार करावेत', असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. वाढत्या सर्पदंश घटनांच्या पार्श्वभूमीवर मेडिकलमध्ये 'अँटी-स्नेक व्हेनम'चा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले