

नागपूर : एसबीएल एनर्जी कंपनीमधील आजवर 25 कामगारांच्या मृत्यूस जबाबदार भीषण स्फोटाच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सहा संचालकांचे अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावले. सत्र न्यायालयाने या संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज गुणवत्ताहीन ठरवले. या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी हा निर्णय दिला.
केदान अरविंद पंचपुत्रे, श्रवणकुमार, रवींद्र पोखरना, सत्यवती पराशर, मनोजकुमार प्रसाद व अलोक राधेश्याम अवधिया, अशी अर्जदार आरोपी संचालकांची नावे आहेत. आतापर्यंत २५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. १७ कामगार गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेटोनेटर्स, एक्सप्लोसिव्ह, कास्ट बूस्टर, आदी स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये १ मार्च २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास हा स्फोट झाला. ही कंपनी राउळगाव शिवारात कार्यरत होती.
या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी एकूण ३२ आरोपींविरोधात बीएनएस कलम १०५, १२५(अ) व (ब), २८८ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. जिल्हा सरकारी वकील ॲड. नितीन तेलगोटे व अभियोग सहायक संचालक ॲड. मैथिली काळवीट यांनी संचालकांच्या जामिनाला विरोध करताना विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.