

नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या शांततापूर्ण आंदोलकांवर दिल्लीत पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवत, माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख राष्ट्रपतींकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती भवनाला पाठवण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलनात अनेक कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "आपले मत मांडणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी अचानक अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला," असा थेट आरोप अनिल देशमुख यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.
तीन दिवस अनिल देशमुख हे दिल्ली येथे होते. घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या डोळ्यासमोर बघीतला. विद्यार्थी व विद्यार्थिनी वर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला तसेच मुलींचे कपडे सुद्धा फाढण्यात आले. या संपूर्ण घटनेची आणि पोलिसांच्या बळप्रयोगाची एका निष्पक्ष व उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. शांततापूर्ण आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांवर आणि प्रत्यक्ष बळप्रयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची व कडक कायदेशीर कारवाई व्हावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या स्तरावरून योग्य निर्देश जारी करावेत; अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असल्याने त्या या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन आंदोलकांना नक्कीच न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षाही अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.