

नागपूर : शेतकरी आंदोलनाच्या वेळी ठरलेली मुदत जून महिना सुरू होताच राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या कर्जमाफी योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्याना ३० जूनपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' या नावाने आश्वासनाची पूर्ती सरकारने केली असली तरी ही कर्जमाफी सरसकट नसणार आहे. नियमित कर्ज परतफेड केलेली शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. नागपूर जिल्ह्यात ३८ हजार १२५ शेतकऱ्यांनी 644 कोटी 93 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा अधिक असेल त्यांना 2 लाखापर्यंत लाभ मिळेल.
जिल्ह्यात 34 हजार 549 शेतकऱ्यांनी 445.21कोटी सार्वजनिक बँक, 1हजार 429 शेतकऱ्यांनी खासगी बँकेतून 30.24 कोटी, 1 हजार 855 शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेकडून 166.11 कोटी, ग्रामीण बँकेच्या माध्यमातून 281शेतकऱ्यांनी 3.14 कोटी, लघु वित्त बँक 11 शेतकऱ्यांकडून 23 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.