

राजेंद्र उट्टलवार
नागपूर : महाप्रसाद .. यात खरेतर नवल फारसे नाही. सध्या धार्मिक, सामाजिक उत्सवांमध्ये भव्य महाप्रसाद आयोजन हे सुरूच असते. आज आपण बोलतोय ते नागपुरातील श्री टेकडी रोड हनुमान मंदिर समितीतर्फे येथील बाल हनुमान मंदिरात होणाऱ्या भव्यदिव्य महाप्रसादाविषयी... कारण या ठिकाणी मध्यरात्री उशिरापर्यंत किमान दोन लाखांवर भाविक प्रसाद घेतात. विदर्भातील जे सर्वात मोठे आयोजन मानले जाते.
विशेष म्हणजे गॅस टंचाईचा कुठलाही परिणाम यावर झालेला नाही कारण सर्व स्वयंपाक चुलीवर होतो. या ठिकाणी पाच, पन्नास शंभर किलो नव्हे तर तब्बल दोन ट्रक भाजीपाला लागतो. यात आलू, कांदे, टमाटर, फुलकोबी, पालक, सांबार,मिरची, कोहळे असे सारेकाही असते. जुळवाजुळवसाठी पूर्वतयारी देखील दोन तीन महिन्यापासून केली जाते. 500 किलो शुद्ध तूपापासून या ठिकाणी बर्फी तयार केली जाते. पातलभाजी, मिक्स वेज भाजी असते. केरसांगरी राजस्थानमधून बोलावली जाते. काल आणि आज अशा दोन दिवस पोळ्या तयार केल्या जातात. पकोडे आणि बर्फी आधीच तयार केली जाते. आंब्याचे लोणचे देखील असते. पिण्याच्या पाण्यासाठी, हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.
आता या इतक्या मोठ्या प्रमाणातील स्वयंपाकासाठी मनुष्यबळ देखील मोठेच लागणार ना? दोनशेवर लोक यासाठी तीन चार दिवस अहोरात्र पाकशाळेत काम करतात. 70 आचारी आणि त्यांचे सहकारी 60 महिला पोळ्या तयार करण्यासाठी आणि 60 महिला प्लेट,भांडी धुण्यासाठी राबत असतात. अनेकजण दरवर्षी विदर्भातील ठिकठिकाणाहून सेवा देण्यासाठी येतात. मंदिराचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते कुणीही नावासाठी धडपडताना दिसत नाहीत हे विशेष. आज गुरुवारी हनुमान जयंती निमित्ताने सकाळी साडेअकरा वाजता महाआरती झाली आणि या महाप्रसादाला सुरुवात झाली.
प्रभू इच्छा तक.... ! अशी ही महाप्रसादाची रात्री उशिरापर्यंत वेळ असते. याशिवाय दानदात्यांसाठी त्याचप्रमाणे नाममात्र शुल्क घेऊन आपण घरी देखील हा पॅक प्रसाद नेऊ शकतो. यासाठी 25 कार्यकर्त्यांसह किमान 70 जण पॅकिंगच्या प्रक्रियेत गुंतलेले असतात. एक ते सव्वा लाख रुपयांचे साहित्य पॅकेजिंगसाठी लागत असल्याची माहिती रामसेवक पदाधिकाऱ्यांनी दिली.