

नागपूर : केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये नागपुरातील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एलआयटी हे खूप मोठं नाव आहे. गेल्या आठ दशकांत जगभरात सर्वोत्तम केमिकल इंजिनियर्स तयार करणाऱ्या या संस्थेतून भविष्यातही असेच सर्वोत्तम इंजिनिअर्स मिळत राहतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी व्यक्त केला.
एलआयटी येथील कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते . मुख्यमंत्री म्हणाले ,या संस्थेचे कार्य आठ दशकांपासून सुरू आहे. जगातील सर्वोत्तम केमिकल इंजिनियर्स एलआयटीचे विद्यार्थी झाले आहेत. गेल्या काही काळात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे एलआयटीचा दर्जा काहीसा खालावत होता. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एलआयटीला स्वायत्तता दर्जा देऊन त्याला एक नवा दिशा द्यावी.
आम्ही लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला अभिमत विद्यापीठ असा दर्जा देत संस्थेच्या संरचनेत बदल केले, ज्यामुळे तिचा दर्जा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या बदलामुळे एलआयटीचा कॅम्पस एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखा तयार होत आहे.