

नागपूर - ओडिशातून मध्यप्रदेशच्या दिशेने कुलर,पंखे, ब्लँकेट,जॅकेट भरलेल्या ट्रकमधून होणारी अंमली पदार्थांची मोठी तस्करी रोखण्यात राजस्व गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. रविवारी पहाटे नागपूर जिल्ह्यातील सावनेरजवळील भागीमहारी टोल प्लाझावर डीआरआयने एका ट्रकमधून तब्बल ५२२ किलो गांजा जप्त केला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत २ कोटी ६१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ओडिशातून छत्तीसगड व महाराष्ट्र मार्गे मध्यप्रदेशात गांजाची मोठी खेप पाठवली जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे सुमारे ५ वाजता सावनेर परिसरात पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. भागीमहारी टोल प्लाझावर संशयित ट्रक (एमपी ०४ जीबी ३८५९) येताच तो थांबवून झडती घेण्यात आली.
कूलर-फॅनच्या आड गांजा या ट्रकमध्ये कूलर, पंखे, ब्लँकेट आणि जॅकेट्स असा माल बाहेरून दिसत होता. मात्र, याच साहित्याच्या आड मोठ्या शिताफीने हा गांजा लपवण्यात आला होता. यावेळी ट्रकचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली गेली. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसांचा पोलिस रिमांड मंजूर करण्यात आला. आरोपींची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, ते दोघेही ओडिशाचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
तस्करीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, ओडिशातून मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी विविध राज्यांत केली जाते. अटकेत असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान या आंतरराज्यीय तस्करी नेटवर्कचे धागेदोरे उघड होण्याची दाट शक्यता आहे. डीआरआयचे पथक सध्या या प्रकरणात सखोल तपास करत असून, आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच डीआरआयने वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे शेकडो किलो एमडी जप्त केले. त्या कारवाईत सुमारे २०० कोटी रुपयांचा अमली पदार्थ साठा उद्ध्वस्त करण्यात आला होता.