

नागपूर : परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. नागपुरातील कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञान, डिजीटल गॅझेट, गेमिंग कॉम्पुटींग, कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रासाठी मोठे दालन उपलब्ध झाले आहे. नागपूर हे एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) उभारण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स लवकरच महत्वाचे केंद्र ठरेल, राज्यात विविध क्षेत्रातील संशोधनासाठी इनोव्हेशन सिटी तयार करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर आयोजित ‘तंत्रज्ञान कॉम्पेक्स-2025’ प्रदर्शनाला शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. विदर्भ कंम्प्युटर मीडिया डिलर वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश नायडू, सचिव ललित गांधी, उपाध्यक्ष रोहीत जयस्वाल, कोषाध्यक्ष जयंतीभाई पटेल, सहसचिव संजय चौरसीया, माजी अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात आज झपाट्याने बदल होत आहेत. यात तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी असून या क्षेत्राविषयी जनतेमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे. गेल्या 30 वर्षांपासून कॉम्पेक्स प्रदर्शनाचे नागपुरात सातत्याने होणारे आयोजन हे विदर्भातील आयटी क्षेत्र, डिजीटल गॅझेट, गेमींग, क्लाउड कॉम्प्युटींग आदी क्षेत्राच्या वृद्धीसाठी महत्वाचे ठरत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत आहे. तरूणांचा अशा आयोजनात सहभाग वाढत आहे. नागपूरसह विदर्भ या आयोजनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पाउल पुढे जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता बदल घडवत आहे. याचा स्वीकार करणे गरजेचे असून राज्य शासनाने गुगल सोबत सामंजस्य करार करून नागपूर आयआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय सुरू केले आहे. येत्या काळात हे देशातील महत्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या बदलामुळे संशोधनातही काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे. देशात सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून तंत्रज्ञान क्षेत्राची यात महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्वाधिक युनिकॉनही राज्यातच आहेत. मुंबई ही देशाची अर्थ व तंत्रज्ञान राजधानी ठरत आहे, असेही फडणवीस म्हणाले.