

नागपूर - देवदर्शनाला गेलेल्यांचा ११ मार्च रोजी झालेल्या भीषण अपघाताची जखम अजून ओली असतानाच, आज गुरुवारी पुन्हा एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कामठीच्या रनाळा येथील एका तरुण व्यावसायिक आणि नागपूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. उज्जैनहून दर्शन घेऊन नागपूरकडे परतत असताना बैतूल-हरदा सीमेजवळ चालकाला झोपेची डुलकी आल्याने ही कार उलटली आणि हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जाते.
भक्तीचा प्रवास ठरला अखेरचा
रनाला येथील शुभम हा चुलत भाऊ अमन जयस्वाल (२६) आणि नागपूरचे नातेवाईक जतिन कनोजिया (३४) व पारस कनोजिया यांच्यासोबत मंगळवारी रात्री ११ वाजता कारने दर्शनासाठी निघाला होता. उज्जैन आणि नलखेडा येथील आई बगलामुखीचे दर्शन घेऊन परतत असताना गुरुवारी सकाळी ८:३० च्या सुमारास ढेकना गावाजवळ त्याच्यावर मृत्यूने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चालवत असताना पारस याला झोपेची डुलकी लागली आणि कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. मागच्या सीटवर झोपेत असलेल्या शुभमचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. मागे येत असलेले कार चालक अंकित तिवारी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले. जखमी अमनच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून जतिन आणि पारस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भोपाळला हलवण्यात आले आहे. उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पारस कनोजिया याचा सुद्धा मृत्यू झाला.
पित्याचा आधार हरपला
शुभम हा अविवाहित होता आणि आपल्या वडिलांना प्रॉपर्टीच्या कामात मदत करायचा. ऐन तारुण्यात त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.