नागपूर : पुढारी वृत्तसेवा
युवकांमध्ये संभ्रम होता, युवक महाविकास आघाडीबरोबर आहेत हे मुंबईतील विद्यापीठ निकालाने दाखवून दिले. महायुती विरोधात कल देण्याचा निर्धार, सर्व स्तरातील लोकांनी केला असल्याचे प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.
कुठल्यातरी रायटरला मुख्यमंत्री नावाचे नाटक लिहायला सांगावे लागेल, त्यात तीन फिरते रंगमंच असतात, सत्तेच्या खुर्चीचा मोह किती अस्वस्थ करतो, हे दिसून येत आहे. मात्र, दिल्लीची पूर्ण फौज आली तरी आता महाराष्ट्रात सत्ता येणार नाही. जनतेने यांस महाराष्ट्राच्या मातीत घालण्याचा निर्णय केला आहे.
राज्य पोलीस महासंचालकाची मुद्गत संपली आहे. या अधिकाऱ्यांस पदावर ठेवणे योग्य नाही. सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर होऊ नये, मुद्दतवाढ दिलेली व्यक्ती त्या पदावर नसावी. सगळेच नियमबाह्य सुरू आहे. काम नियमबाह्य, बदल्या नियम बाह्य, नागपूर ग्रामीण अधीक्षकांनी 100 च्या वर बदल्या केल्यात, आयपीएस अधिकारी मिंधे झाल्याचे महाराष्ट्र बघत आहे, आन बाण शान गेली आहे. भविष्यात शिवनगरी उभारली जाईल, पण पुन्हा कमिशन खाऊ घालू नका, गेलेली इज्जत परत मिळवता येणार नाही.
दरम्यान, धर्मवीर चित्रपट संदर्भात छेडले असता मनोरंजन म्हणून चित्रपट पहावा, चित्रपट रियल स्टोरी नाही, त्यात शोध घेऊ नका आणि बोधही घेऊ नका असा सबुरीचा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.