

नागपूर : कुणामुळे राज्यात काँग्रेसचा वर्षभर विधानसभा अध्यक्ष होऊ दिला गेला नाही हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. राज्यात केवळ आपल्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. महायुतीचे सरकार आले, असे वारंवार बोलून मलाच नव्हे तर काँग्रेस पक्षाला बदनाम केले जाणार असेल तर मलाही सर्व काही सत्य जनतेपुढे आणावेच लागेल. त्यासाठी मला उगीच बोलायला भाग पाडू नका, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. अर्थात आघाडीचा, मित्रपक्षांचा धर्म आम्ही पाळणारे आहोत. यासंदर्भात आपल्याला हाय कमांडने परवानगी दिली तरच सविस्तर बोलता येईल, असेही ते म्हणाले.
‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करायला मी काही संजय राऊत नाही, असा टोला पटोले यांनी लगावला. ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होणार हे आपण अधिवेशनात बोललो. त्याची सुुरुवात झालेली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे आजचे नाही. खूप जुने आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बोलले आहेत. नेमका सीडीआर सामाजिक कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीकडे कसा जातो, तिकडून कुणाला टार्गेट केले जाते हे पाहता भोंदू खरात प्रकरण हे एक निमित्त असून फडणवीस समर्थक, विरोधक एकवटले हे सर्व पाहता राजकीय भूकंपाची सुरुवात झालेली असल्याचा दावा पटोले यांनी केला.
दरम्यान, बारामती येथील पोटनिवडणूक काँग्रेस उमेदवार लढणार का, याबाबत छेडले असता तो निर्णय हाय कमांडने घेतलेला असल्याने त्यावर बोलता येणार नाही. 13 एप्रिलला अर्ज माघारीचा दिवस असल्याने हाय क मांड योग्यवेळी योग्य निर्णय घेईल असेही पटोले म्हणाले.