

नागपूर : शहीद जवान व अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसेच कायदेशीर वारसदारांना शेतीसाठी शासकीय जमिनीचे हस्तांतरण करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. महसूल विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून हा निर्णय शहीदांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या पूर्वी शहीद जवानांच्या कुटुंबियांनाही शासकीय जमिनीच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मात्र महसूल विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाने वीरमाता, वीरपत्नी आणि शहीद कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कायदेशीर वारसदारांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्यास मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमान प्रवासाबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवासी विमानाने प्रवास करण्याचा आदर्श घालून दिला आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्याच पद्धतीने प्रवास केल्याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले. देशहितासाठी घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विमानातील चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रवासादरम्यान विविध विषयांवर चर्चा होत असते. प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होतातच असे नाही. इतर प्रवासी उपस्थित असताना राजकीय विषयांवर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत हे आमचे मित्र आहेत. भारतीय जनता पक्षातील माझा ३५ वर्षांचा प्रवास आहे. त्यांनी उपरोधिक भाष्य केले असेल.
राज ठाकरे आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत गौरवोद्गार काढले आहेत. संघाने देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव त्यांनी केला असून त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही.
उदय सामंत यांच्या सोशल मीडिया स्टेटसबाबत ते म्हणाले की, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील. मात्र भाजप आणि शिवसेनेची गेल्या ३० वर्षांची युती अधिक मजबूत असल्याचेच यातून अधोरेखित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलेला आदर्श कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, या विषयावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. दोषी आढळणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
महसूल विभागातील कथित घोटाळ्याबाबत ते म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये केवळ तफावत आढळली आहे. महसूल विभागाकडे क्वासी-ज्युडिशियल अधिकार असल्यामुळे मुद्रांक शुल्क वाढविणे किंवा कमी करण्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक तफावत म्हणजे घोटाळा असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून तपास सुरू आहे.