

नागपूर: लव्ह जिहादच्या नावावर वाढत असलेल्या घटना निश्चितच वाईट आहेत. खोटी ओळख देत समोरच्या व्यक्तीची फसवणूक करीत लग्न करणे आणि मुले जन्माला घालून त्यांना सोडून द्यायचे ही जी प्रवृत्ती वाढत चालली आहे. यात फूस लावणे, फसवणे किंवा जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे हे मात्र योग्य नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टानेही आपल्या निर्णयात लव जीहादची वास्तविकता प्रदर्शित केली आहे. केरळ हायकोर्टने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात सातत्याने अशा घटना घडत असून या प्रकरणाची भर पडत आहे. शेवटी एक समजून घ्या की, एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न करणे वाईट नाही. मात्र आपली खोटी ओळख देत लग्न करणे, मुले झाल्यावर ती सोडून देणे ही गंभीर घटना आहे. यासाठीच या संदर्भात योग्य ती कारवाई राज्य सरकार करणार आहे असेही संकेत त्यांनी दिले.
यासंदर्भात राज्य सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या समिती संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दरम्यान, दिल्ली येथे चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असून यापुढे अशा घटना होऊ नयेत यादृष्टीने काळजी घेण्याची गरज एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली. नागपुरातील रेशीमबाग येथे व्हॅल्युएबल ग्रुप तसेच सत्संग फाउंडेशनच्या वतीने गेले दोन दिवस कुंभ स्नानाची अनुभूती हा महाकुंभ कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात विविध संतांच्या पादुकाचे दर्शन,विविध धार्मिक कार्यक्रम तसेच प्रयागराज येथून आणलेल्या जलकुंभातील जलाचा तंत्रज्ञानाच्या साह्याने लोकांवर जलाभिषेक सुरू आहे.