

नागपूर - कुणी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी 2 लाखापर्यंत कुठल्याही राष्ट्रीयकृत किंवा इतर बँकामार्फत देण्यात आलेले पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत.माफी बँकेला द्यायची नसून ती शेतकऱ्यांना द्यायची आहे. कमिटी यासंदर्भात कामाला लागली आहे. आपण घोषणा केली असल्याने 30 जूनपूर्वी ती कर्जमाफी होणारच आहे. विशेष म्हणजे जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा आम्ही देणार आहोत ती कर्जमाफी चांगली राहील असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते उपराजधानीत होते.
दरम्यान, अमेरिका - इराण युद्धाबाबत बोलताना त्यांनी माध्यमांवरच नाराजी व्यक्त केली. उगीच हे होणार, ते होणार अशा पद्धतीच्या बातम्या दाखवून लोकांमध्ये भीती,संभ्रम निर्माण करण्याचे काम कुणीही करू नये, केंद्र सरकार सक्षमपणे युद्धाची परिस्थिती ,यामुळे निर्माण होत असलेले प्रश्न योग्यरित्या हाताळत आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रालाच खूप काही मिळाले असल्याने विदर्भाचाही नक्की फायदा होणारच आहे. विदर्भाला सर्वात महत्वाचे म्हणजे वैनगंगा नलगंगा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यतेसोबतच अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाली आहे. आजवरच्या इतिहासात हा सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प असणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.