

नागपूर : अर्थतज्ज्ञ तथा भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संकटकाळात देशाचा आर्थिक कणा मजबूत ठेवला. अशा थोर व्यक्तीमत्त्वाला भारत सरकारचा ‘भारतरत्न’हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव गुरुवारी नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला. लवकरच तो ठराव, सरकारकडेही पाठविण्याचे निर्देश अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी प्रशासनाला दिले.
जि.प.च्या उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती कुंदा राऊत यांनी हा ठराव मांडला. २६ डिसेंबर२०२४ रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. शेवटच्या घटकापर्यंत काम मिळावे म्हणून त्यांनी मनरेगा योजना आणली. त्यांच्याच काळात राईट टू इन्फॉरमेशन आणि राईट टू एज्युकेशन हे कायदे अंमलात आले. आज प्रत्येकाची ओळख असलेले आधार कार्ड त्यांच्या काळात आले. भारत-अमेरिकेमध्ये अनुकरार त्यांच्या काळात झाला याकडे लक्ष वेधण्यात आले.