

नागपूर : मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. कुणी कुणावरही टीका, कुणाशीही तुलना करू शकतात पण मी चरित्र जपले. जे बोललो ते केले. समजून विश्वास ठेवणे श्रध्दा आणि न समजून घेता विश्वास ठेवणे अंधश्रद्धा आहे. चमत्काराच्या आड होणारे धर्मांतरण रोखण्याचा माझा प्रयत्न आहे. अंधश्रध्दा वाढविण्याचे काम आमच्या दिव्य दरबारात होत नाही असे सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्रा. श्याम मानव यांनी दिलेले दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे, 80 लाख रुपये जिंकण्याचे आव्हान बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी आज रविवारी माध्यमांशी बोलताना बेदखल केले.
हनुमानाची भक्ती करायला सांगणे ही अंधश्रद्धा नाही. प्रत्येकजण आपले काम करतात असे सांगितले. लव्ह जिहादमुक्त नागपूर, महाराष्ट्र आणि भारत हा आपला उद्देश असल्याचे सांगताना त्यांनी सनातनी युवती, महिलांनी नाव, वेश बदलून मोहजालात फसविणाऱ्या लव्ह जिहादपासून सावध राहण्याची जागृती करण्यासाठी ही रामकथा असल्याचे आवाहन केले.
तू कुणीही हो पण कधी नाचणारी, बुरखेवाली होऊ नकोस ,चाचा के 30 बच्चे, हमारे चार क्यो नहीं... असा सवाल धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना केला. उद्या मी पण गृहस्थाश्रमात जाणार असून चार मुले झाल्यास ती सनातनी राष्ट्रसेवेसाठीच राहील असे संकेत त्यांनी दिले. हिंदुराष्ट्रासाठी रथयात्रा काढली जाणार आहे. महाराष्ट्रातही मोठा यज्ञ होईल असे स्पष्ट केले. यासोबतच देशात कुठल्याही धर्माचे श्रद्धास्थान निर्मितीला आमचा विरोध नाही मात्र बाबर हा परकीय आक्रमणकर्ता असल्याने त्याच्या नावाने कायम विरोधच राहील असे एका प्रश्नाच्या उत्तरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले.