Nagpur Devendra Fadnavis:'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचे षडयंत्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis latest update: देशांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींचा सहभाग असूनही कोणीही ‘इस्लामिक दहशतवाद’ असा शब्द वापरला नाही. मात्र, भारतात जाणीवपूर्वक ‘हिंदू आतंकवाद’ किंवा ‘भगवा आतंकवाद’ असे शब्द प्रचलित करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisFile Photo
Published on
Updated on

Devendra Fadnavis Hindu terrorism remark news

नागपूर: "केंद्रातील तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने 'हिंदू आतंकवाद' हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक तयार करून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र रचले होते," असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.१) नागपुरात केला.

मालेगाव आणि समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी नेत्यांना गोवण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यात आला होता, मात्र लवकरच यामागील सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक: फडणवीस

माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी यूपीए सरकारच्या कार्यकाळावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींचा सहभाग असूनही कोणीही ‘इस्लामिक दहशतवाद’ असा शब्द वापरला नाही. मात्र, भारतात जाणीवपूर्वक ‘हिंदू आतंकवाद’ किंवा ‘भगवा आतंकवाद’ असे शब्द प्रचलित करण्यात आले.

फडणवीस यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ खालील मुद्दे मांडले:

  • राजकीय षडयंत्र: मालेगाव आणि समझौता एक्सप्रेस स्फोटांनंतर संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी हे शब्दप्रयोग तयार केले गेले.

  • अधिकाऱ्यांवर दबाव: अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर विशिष्ट लोकांना या प्रकरणात गोवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, परंतु ते अधिकारी दबावाला बळी पडले नाहीत, हे आता स्पष्ट होत आहे.

  • पृथ्वीराज चव्हाणांवर टीका: तत्कालीन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातच हे शब्द वापरले गेले. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा रंग भगवा आहे, हे आता पृथ्वीराज चव्हाणांना कळले असेल, तर तेव्हा ते गप्प का होते?" असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

मंत्रिमंडळात तूर्त मोठे बदल नाहीत, पण मंत्र्यांना वर्तणुकीचा इशारा

राज्यातील काही मंत्र्यांच्या वर्तनामुळे निर्माण झालेल्या वादानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा होती. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. "उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी चर्चा करून दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये किरकोळ बदल केले आहेत. सध्या मंत्रिमंडळात आणखी कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही," असे त्यांनी सांगितले. मात्र, याचवेळी त्यांनी सर्व मंत्र्यांना वर्तनाबाबत कडक इशारा दिला. "मंत्र्यांनी जनतेसमोर आणि माध्यमांसमोर बोलताना व वागताना जबाबदारीचे भान ठेवावे. यापुढे कोणत्याही मंत्र्याचे वर्तन अयोग्य आढळल्यास थेट कारवाई केली जाईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितले.

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर थेट भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेवरही फडणवीस यांनी पडदा टाकला. ते म्हणाले, "धनंजय मुंडे मला तीन वेळा भेटले, पण त्यात मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाची रचना किंवा मंत्रिपदाचे निर्णय हे धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाहीत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जातो."

एकंदरीत, फडणवीस यांनी एकाच वेळी राष्ट्रीय राजकारणातील जुन्या वादावर टीकास्त्र सोडून आणि दुसरीकडे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय स्थितीवर नियंत्रण असल्याचे स्पष्ट करून आपली भूमिका ठामपणे मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news