

नागपूर - सायबर क्राईमचे जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास त्याला तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात ‘सायबर हॅक-2025' या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी, सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट अमित दुबे आदी उपस्थित होते.
देशभरात विविध प्रकारचे सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. येत्या काळात विशेषतः सायबर क्राईमवर लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राने सायबर प्लॅटफॅार्म तयार केला आहे. केंद्र शासनानेही या प्लॅटफॅार्मचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सायबर हॅक हा नागपूर शहर पोलिसांचा सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा यासंबंधीच्या आगामी आव्हानांवर उपाय शोधण्यासाठीचा एक आगळावेगळा उपक्रम होता. सायबर गुन्ह्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पाच विषयांवर झाली. पहिल्या टप्प्यात (ऑनलाइन फेरी) आयोजित करण्यात आली. या पहिल्या फेरीत देशभरातून ६०० संघांनी भाग घेतला आणि सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या समस्या सोडविण्याचे उपाय सादर केले. या ६०० संघांमधून २० संघांची अंतिम फेरीसाठी (ऑफलाइन फेरी) निवड करण्यात आली. अंतिम फेरी ७ आणि ८ जानेवारी दरम्यान आयआयएम नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील रामदेवबाबा महाविद्यालय (प्रथम), इन्फोसिस कॅार्पोरेट (द्वितीय) तर रायसोनी महाविद्यालय (तृतीय) या विजेत्या संघांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.