नागपूर : बांगला देशमधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत आहे. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
बांगला देशातील भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते पंतप्रधान मोदी यांची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात. ज्यांना याही परिस्थितीत राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिलीय. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत. हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगला देशचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे. हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शहजाद्यापुढं दिल्लीत जरूर लोटांगण घालावे, मात्र आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अगाध ज्ञान पाजळू नये, असे बावनकुळे म्हणाले.