![Anil Deshmukh](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F977b55c9-358f-466d-94be-941dc0bf0163%2FAnil_Deshmukh_.jpg?rect=0%2C0%2C1280%2C720&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : तेलंगणा सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी आश्वासन पूर्ण केले. महाराष्ट्रातील सरकारनेही कर्जमाफीची घोषणा २७ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करावी, या मागणी सोबतच राज्यातील भाजपचे सरकार केवळ तीन महिन्यांचे असून त्यानंतर महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. अनेक अधिकारी शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करत आहेत. त्यांची यादी आम्ही जिल्हानिहाय तयार करत असून आमचे सरकार आल्यावर निश्चितच कारवाई करणार, असा इशारा माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये २०२४ साली देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ती अजूनही पूर्ण केलेली नाही. एकीकडे आरक्षण द्यायचे आणि आपल्याच लोकांना कोर्टात जाऊन स्थगिती आणायला लावायची, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाचे त्यांनी समर्थन केले.
मराठा, कुणबी,ओबीसी परस्परविरोधात आज उभे ठाकले असून राज्यात तेढ वाढू नये, याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. २३ लाख मुलांच्या भवितव्याचा प्रश्न नीट परीक्षेशी संबंधित असून सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, केंद्र शासन, धर्मेंद्र प्रधान यांनी या संदर्भात असे काही झालेच नसल्याची भूमिका व्यक्त केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात वारंवार ड्रग्सचा कारभार उघडकीस येतो, ललित प्रकरणात कोटयवधीचे ड्रग्स पकडले गेले. आजही अनेक हॉटेल्स, पबमध्ये ड्रग्स विकले जात असल्याचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. तरीही राज्य शासन गंभीर नाही. एक-दोन अधिकारी निलंबित करून उपयोग नाही, सरकारने याकडे गाभीर्याने लक्ष घातल्यास हे प्रकार थांबू शकतात, असेही देशमुख यावेळी म्हणाले.