

नागपूर: भटके विमुक्त कल्याणकारी बहुद्देशीय संस्था तथा भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने दोन दिवसीय बिऱ्हाड परिषदेचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अखिल भारतीय घुमंतू कार्य प्रमुख दुर्गादास व्यास, बिऱ्हाड परिषदचे संयोजक राजेंद्र दोनाडकर, सहसंयोजक अमोल यंगड यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटके जाती-जमातीच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प तडीस नेण्यासाठी भटके जाती-जमातीच्या समाजबांधवाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे सरकारचे दायित्व असल्याचे सांगितले. भटके विमुक्त कल्याणकारी बहुद्देशीय संस्था तथा अन्य सामाजिक संघटनाची मदत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान ,अतुल सावे यांनी भटके समाजासाठी कृतीआराखडा बनवन्यात येईल व प्रत्येक जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करुन भटके जाती-जमातीच्या शिक्षण, रोजगार आरोग्य संबंधित समस्याचा सोडविण्यात येईल, असे जाहीर केले. भटके जाती-जमातीच्या पाडे, पालावर विशेष शिबीरे आयोजित करुन आयुष्यमान भारत व जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड, आधार व मतदान प्रमाणपत्रे वितरित केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. भटके समाजासाठी शासनाने चार हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद करुन शंभर विद्यार्थ्यांना परदेशीं शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली असुन समाजात वंचित घटकांना दहा लाख पक्के घर बांधून देणार असल्याचा पुनरूचार केला.
बिऱ्हाड परिषदचे संयोजक राजेंद्र दोनाडकर यांनी प्रस्ताविक भाषणात शासन व प्रगत समाजाने दुरी व दरी कमी करुन भटके जाती-जमातीच्या विकासासाठी दायित्व घ्यावे. बिऱ्हाड समाजाचे धगधगते वास्तव व आर्त हाक ऐकून घ्यावी असे आवाहन केले.
बिऱ्हाड परिषदेत भटके जाती-जमातीच्या लोकांना जात व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या अटीमध्ये शिथिलता द्यावी. गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना पक्के घर बांधून द्यावी. अत्यावश्यक असलेले शासकीय प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करुन द्यावे असे ठराव पारित करण्यात आले व तसे निवेदन चंद्रशेखर बावनकुळे व अतुल सावे यांना देण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे देण्यात आली. सुत्रसंचलन श्रीकांत तिजारे यांनी केले तर आभार महेंद्र गोबाडे यांनी मानले. या दोन दिवशीय बिऱ्हाड परिषदेला संपूर्ण विदर्भातून वेगवेगळ्या भागातुन भटके जाती-जमातीचे लोक व त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.