

नागपूर - बांगलादेशी घुसखोरी देशात काही नवीन नसली तरी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी आलेले 2 लाखावर अर्ज, अनाधिकृत बांगलादेशी रोहिंग्याना भारतीय नागरिकत्व अर्थात जन्म प्रमाणपत्र देण्याचा काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा प्रयत्न असून या घोटाळ्यातील अर्ज पडताळणी होत नाही तोवर कुणालाही प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून खोटे कागदपत्र सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, एटीएसने चौकशी करावी, मुंबई, नागपूर वगळता महाराष्ट्रातील 40 शहरे यासाठी निवडण्यात आली. जुलै 2024 नंतरच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले हा मोठा मास्टर प्लॅन असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
नागपूर, अकोला, यवतमाळ येथे या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यापूर्वी वर्षभरात चार ते पाच हजार अर्ज येत होते. मात्र आता विदर्भातील एकट्या यवतमाळमध्ये 11864 अर्ज आले.अमरावती, मालेगाव येथे आपण विरोध केला असता खासदारांनीच आपल्यावर आरोप केले. हे मोठे रॅकेट असून यात काही दहशतवादी देखील असू शकतात. देशाच्या सुरक्षिततेची कुठल्याही परिस्थितीत खेळ नको याकडे लक्ष वेधतानाच उद्धव ठाकरे, काँग्रेसचे हे व्होट जिहाद पार्ट टू असल्याचा आरोप केला.
दरम्यान, मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची घोषणा याकडे लक्ष वेधले असता याविषयीचे उत्तर राहुल गांधी, शरद पवार यांनीच द्यावे. एकट्याने लढून काय मिळणार, तिघे एकत्रित लढून 288 जागांपैकी केवळ 48 जागा मिळाल्या असे असताना आता जी काही ओरडाआरड, शिवीगाळ चालली आहे ती केवळ आपले अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.