

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
मनोज जरांगे यांनी आज अचानक निवडणुकीतून माघार घेतली त्यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. माघार घेताना जरांगे जे बोलले आहेत, की एका जातीवर राजकारण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहेत. त्यासोबत पैशाची ताकदही असते. हे समीकरण मोठ्या पक्षांनी सुरू केले आहे. त्यामुळे जरांगे जे बोलले ते योग्यच आहे. मुळात आपण केलेलं काम समोर ठेवून निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमीका बच्चू कडू यांनी मांडली.
मी चार वेळेला निवडून आलो. कारण लोकांनी मला निवडून दिलं. पक्षांची झुंडशाही मी माझ्या मतदारसंघातून संपवली. तेच महाराष्ट्रात करू असं ते म्हणाले. एका जातीचे आधारावर राजकारण होत नाही हे तुम्ही मनोज जरांगेना आधी समजावून सांगितलं नव्हतं का? या प्रश्नावर मी काही कोणाचा राजकीय गुरू नाही. त्यामुळे समजून सांगायची गरज नाही आणि जरांगे तसे हुशार आहेत अस बच्चू कडू म्हणाले. मातीवरच्या जमिनीवरच्या माणसाला समजावून सांगायची गरज पडत नाही. मोठ्या नेत्यांना समजावून सांगणारे पंधरा-वीस लोकं असतात. मात्र बच्चू कडू आणि इतर जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना समजावण्याची गरज पडत नाही.
निवडणुकीतून माघार घ्यायला जरांगेंवर कोणता दबाव होता असं मला वाटत नाही. जरांगे हे दबावाला बळी पडणारा माणूस नसल्याचं त्यांनी म्हंटलं. तसेच जरांगेंच्या निवडणुकीतून माघारीचा फायदा कोणाला होईल याचे कुठलेही मोजमाप यंत्र नाही. ग्राउंडवरची राजकीय परिस्थिती वेगळी असते असे ते म्हणाले.