नागपूर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी नागपूरसह विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांच्यासाठी पाठपुरावा केला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा येथील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदा बुधवार, १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे १२ जुलैनंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असणार आहे.
पंढरपूरला जाणाऱ्या मोजक्या रेल्वे गाड्या असल्यामुळे अनेकांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकायला लागणार होते. या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू व्हायला हव्यात, अशी विदर्भातील भाविकांची मागणी होती. या गोष्टीचा विचार करून गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली. विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आषाढीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. भाविकांची संख्या बघता विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची आवश्यकता आहे.
नागपूर, अमरावती व खामगाव अशा तीन ठिकाणांहून या गाड्या सुटणार आहेत. नागपूर येथून १४ व १५ जुलै, अमरावती येथून १३ व १६ जुलै तर खामगाव येथून १४ व १७ जुलैला या गाड्या सुटणार आहेत. या तिन्ही गाड्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधून जाणार आहेत, हे महत्त्वाचे. याशिवाय १८ व १९ जुलैला मिरज ते नागपूर अश्या परतीच्या मार्गावरील गाड्या धावणार आहेत.