नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दिवसेंदिवस वाढत असून आम्हाला हे मीटर नकोच असा आग्रह वाढला आहे. काल बुधवारी (दि.१२) व्हेरायटी चौकात विदर्भवाद्यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरला कडाडून विरोध करत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व नरेश निमजे आणि मुकेश मासुरकर यांनी केले. शहरातील विविध भागात स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीकडून सभा व निदर्शनातून स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध सुरूच आहे. बुधवारी पोलिसांनी १५ ते १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमानी पद्धतीने अदानी सारख्या उद्योजकांच्या फायद्यासाठी स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आणल्याचा आरोप करीत आंदोलकांनी ही योजना रद्द न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.
आंदोलकांच्या मते, अदानी, एनसीसी, मॉन्टेकार्लोसह इतर भांडवलदारांच्या फायद्यासाठी ही योजना आहे. ही योजना विद्युत क्षेत्राची खाजगीकरणाकडे अशी ही वाटचाल आहे. दरम्यान, या योजनेमुळे महावितरणमधील लेखा व देयक विभागातील २० हजार कामगार बेरोजगार होतील.
ग्राहकांची चूक नसताना मीटर बंद पडणे, जळणे यासारखे प्रकार झाल्यास उपाय काय?, याचे उत्तर महावितरणकडे नाही. मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होईल, परंतु, मीटर छेडछाड, वीजचोरी कमी कशी होणार? याचे उत्तर नाही. याही मीटर्समध्ये छेडछाड व वीजचोरी होऊ शकते. चालू स्थितीतील अंदाजे २.२५ ते २.५० कोटी मीटर्स भंगारात टाकले जाईल. या मीटरचा वापर काय?, त्यांच्या आधी केलेल्या गुंतवणुकीचे काय?, याचेही उत्तर कुणाकडे नसल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत आहेत.
हेही वाचा